ठाणे :- ठाणे जिल्ह्यात भविष्यात लागू होणाऱ्या ॲग्री स्टॅक आयडी प्रणालीच्या अनुषंगाने खत वितरण प्रक्रियेत होणाऱ्या बदलांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समितीने दि. २१ एप्रिल, २०२६ रोजी भिवंडी तालुक्यातील पडघा येथे पाहणी दौरा केला. या दौऱ्यात समितीच्या सदस्या सरीता तिरूमला आणि महेश वाकोडे यांनी प्रत्यक्ष भेट देत सध्याच्या प्रणालीचे परीक्षण केले.
या भेटीचा मुख्य उद्देश पीओएस (e-Point of Sale) मशीनला ॲग्री स्टॅक आयडीशी लिंक करून शेतकऱ्यांच्या जमीन धारणेनुसार खत वितरण कसे करता येईल, याबाबत प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेणे हा होता. समितीने पडघा येथील दोन कृषी सेवा केंद्रांना भेट देऊन तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी कृषी विकास अधिकारी मुनिर बाचोटीकर व मोहीम अधिकारी महेश बनकर उपस्थित होते. समिती सदस्यांनी संबंधित विक्रेत्यांशी संवाद साधत सध्या सुरू असलेल्या आधार-आधारित खत वितरण पद्धतीबाबत माहिती घेतली.
पाहणी दरम्यान समिती सदस्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत सध्याच्या पद्धतीत येणाऱ्या अडचणी, अनुभव आणि अपेक्षा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी आधार-आधारित प्रणालीमुळे खत वितरणात पारदर्शकता वाढल्याचे नमूद केले; मात्र काही तांत्रिक अडचणींचाही त्यांनी उल्लेख केला.
यावेळी समितीने स्पष्ट केले की, भविष्यात ॲग्री स्टॅक आयडी प्रणाली लागू झाल्यानंतर खत वितरण अधिक शिस्तबद्ध आणि अचूक होईल. शेतकऱ्यांच्या जमीन धारणेची नोंद प्रणालीशी जोडली गेल्यामुळे त्यानुसारच खताचे वितरण केले जाईल. यामुळे गैरवापराला आळा बसेल तसेच प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे खत वेळेत मिळण्यास मदत होईल.नवीन प्रणालीमुळे कृषी सेवा केंद्रांवरील विक्रेत्यांना खत विक्री करताना अधिक सुलभता मिळणार असून, अनावश्यक तांत्रिक अडचणी कमी होतील, अशी माहिती समितीने दिली.
या पाहणी दौऱ्याच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेला आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भविष्यात खत वितरण अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि शेतकरी-केंद्रित करण्यासाठी ॲग्री स्टॅक आयडी प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास समितीने व्यक्त केला.
000

