ठाणे शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने केवळ कार वॉशिंग सेंटरवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात येत आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रशासनाने सोपा मार्ग निवडत फक्त लहान व कामगारांवर आधारित व्यवसायांवर कारवाई केली आहे. कार वॉशिंग सेंटर हे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन असून, त्यांच्यावर बंदी घालणे म्हणजे थेट कामगारांच्या पोटावर लाथ मारण्यासारखे आहे.
शहरात बेकायदेशीर बांधकामे, वॉटर पार्क्स, मोठमोठे इव्हेंट्स, लग्न समारंभ, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर व अपव्यय होत असताना, त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. प्रशासनाचा हा दुहेरी निकष स्पष्टपणे कामगारविरोधी आणि पक्षपाती आहे.
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आमच्या स्पष्ट मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
- कार वॉशिंग सेंटरवरील बंदी तात्काळ उठवावी.
- पाणी अपव्यय करणाऱ्या सर्व घटकांवर समान आणि कठोर कारवाई करावी.
- निवडक कारवाई थांबवून सर्वांसाठी समान धोरण लागू करावे.
अन्यथा, येत्या काळात भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनाची सर्व जबाबदारी महानगरपालिका प्रशासनावर राहील.
– ऋषिकेश तायडे
अध्यक्ष, ठाणे शहर शेकाप

