निसर्गाच्या कुशीतून आलेल्या चविष्ट रानभाज्‌यांचा उत्सव – ठाण्यात रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न

ठाणे :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (UMED) अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, ठाणे यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘रानभाज्या महोत्सव २०२५–२६’ चे आयोजन करण्यात आले. हा महोत्सव आज, द. ६ ऑगस्ट, २०२५ रोजी बी. जे. हायस्कूल, टेंभी नाका, ठाणे येथे पार पडला. जिल्ह्यातील विविध डोंगरी, दुर्गम व जंगली भागांतून नैसर्गिक पद्धतीने पावसाळ्यात उगम पावणाऱ्या औषधी व गुणकारी रानभाज्यांचे या महोत्सवात प्रदर्शन व विक्री करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातून एकूण ५० स्टॉल्सची मांडणी करण्यात आली होती, ज्यामध्ये १०० स्वयंसहायता गटातील महिला (SHG महिलां) नी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

        या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे मार्गदर्शन करताना म्हणाले की, “रानभाज्या महोत्सव आपल्या ग्रामीण संस्कृतीचे, आरोग्यदायी जीवनशैलीचे आणि स्वयंसहायता गटातील महिलांच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत त्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडते, हीच खरी यशाची पावती आहे."

         आघाडा, शेवळा, कुरकुरी भाजी, भाऱंग, मायाळू, कवळाकवळी, फोडी, दिंडा भाजी, करटोली, टाकळा, शेवगा इत्यादी विविध प्रकारच्या औषधी व पारंपरिक रानभाज्यांनी महोत्सवाला आरोग्यदायी व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून दिले. या रानभाज्यांचे केवळ पोषणमूल्यच नव्हे, तर आरोग्यवर्धक व रोगप्रतिकारक गुणधर्म असल्यामुळे नागरिकांनी महोत्सवाला मोठा प्रतिसाद दिला. यामुळे एकूण नफा ₹ ६३,१८०/- इतका झाला. हा नफा थेट महिलांच्या हाती गेला असून, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तो उपयुक्त ठरला आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली. 

      कार्यक्रम प्रसंगी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा कृषी अधिकारी एम.एम बाचोटिकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन तसेच कृषी विभागाचे अधिकारी, जिल्हा आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          या उपक्रमामार्फत पारंपरिक रानभाज्यांचे संवर्धन, आरोग्य जनजागृती, आणि ग्रामीण महिलांच्या उत्पन्नवाढीसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (UMED) अंतर्गत अशा उपक्रमांद्वारे ग्रामीण जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा उद्देश बळकट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top