ठाणे :- ठाण्यात ४ दिवसांपासून कोसळत असलेल्या धो – धो पावसाच्या सरी मुळे ठाणेकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. त्यात या जोरदार पाऊसामुळे उपवन तलाव पूर्ण भरून ओवर फ्लो होऊन पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे उपवन तलावाकडून जाणारा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी पोलिसांकडून बंद करण्यात आला आहे.
ठाण्याचा हृदय म्हणून ओळखले जाणारे अनेक तलावातील पाणी पातळी भरू लागली आहे. त्यात उपवन तलाव हा एक महत्त्वाचा पर्यटन स्थळ असून येथे अनेक नागरिकांची हजेरी असते. मात्र, गेल्या ४ दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव तुडूंब भरून वाहू लागला असून पाणी थेट रस्त्यावर आल्याने पोलिसांनी येथील मुख्य रस्ता सुरक्षेच्या कारणासत्व बंद केला आहे.
उपवन तलाव तुडूंब भरून ओवर फ्लो होऊ लागल्याने अनेक जवळील भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. महापालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, तलाव परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या घटनेची माहिती मिळताच वर्तक नगर पोलीस, वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आहे. वाहतुकीसाठी रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.