उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार —- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई :- एस.टी. महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे व उत्पन्नवाढीस चालना देणे, या हेतूने उत्पन्न वाढीबरोबर विविध अनावश्यक खर्चात कपात करण्याच्या उपाययोजना राबविणे आवश्यक असून राज्यात पहिल्या आलेल्या धुळे- नंदुरबार विभागाचा पॅटर्न सगळीकडे वापरणे महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ते उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर ,आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख यांच्यासह धुळे नंदुरबार विभागाचे विभाग नियंत्रक विजय गीते, यंत्र अभियंता पंकज महाजन व इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की,१ जुन २०२५ रोजी एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यांचा अनुभव आणि प्रयत्न एसटीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनुकरणीय आहेत. ज्या ज्या विभागांमध्ये आणि आगारांमध्ये उत्पन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले गेले आणि त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले अशा अधिकाऱ्यांचे अनुभव आणि प्रयत्न हे इतरांना देखील समजणे आवश्यक आहे. केवळ राज्यभरातील दोन-चार आगार किंवा विभाग उत्पन्न वाढीमध्ये अग्रेसर असून चालणार नाहीत, तर संपूर्ण एसटी महामंडळ अशा सामूहिक प्रयत्नातून भविष्यात उत्पन्न वाढीमध्ये अग्रेसर असावे यासाठी सर्वांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.
यावेळी तिथे उपस्थित असलेल्या राज्यभरातील विविध अधिकाऱ्यांनी पुढील उपाययोजना सुचवल्या.

१) कमी गर्दीच्या कालावधी मध्ये आणि साप्ताहिक सुट्ट्या दिवशी अत्यल्प प्रतिसाद असलेल्या फेऱ्यांचे पुनरावलोकन करुन चांगले उत्पन्न मिळणाऱ्या मार्गावर त्या फेऱ्या वळवणे. २) लांब पल्ल्याच्या मार्गावर जुन्या बसेस बदलून, नवीन इंधन कार्यक्षम बसेस लवकरात लवकर वापरणे. ३) अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यक्षमतेनुसार योग्य पदावर नियुक्त करून त्यांचे प्रशिक्षण सुनिश्चित करणे. ४) आगार कक्षेत स्थानिक मार्गांवर प्रवासी प्रतिसाद असलेल्या मार्गावर ठराविक वारंवारतेने शटल फेऱ्या चालवणे. ५) RTO अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अवैध वाहतूक रोखून तेथे एसटीच्या अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे. ६) डिझेल इंधन टँकरचा वापर दक्षतेने करून इंधन चोरी रोखणे. ७) वाहनाचे प्रति किमी मायलेज वाढण्यासाठी त्यांची दैनंदिन देखभाल करणे. ८) जुने टायर बदलताना फक्त टायर नव्हे तर नवे ट्युब व फ्लॅपही बदलणे.

   वरील सर्व उपाययोजना बरोबर अनावश्यक खर्चात कपात करण्यासाठी अतिकालीन भत्ता वापरा वर नियंत्रण ठेवणे. कर्मचाऱ्यांना रजा देताना गर्दीच्या हंगामामध्ये जास्तीत जास्त कर्मचारी उपलब्ध होतील याची दक्षता बाळगणे. आठवडा बाजार, यात्रा, जत्रा अशावेळी प्रवासी गर्दीनुसार जास्तीत जास्त बस फेऱ्या उपलब्ध करून देणे. अशा उपाययोजना करण्यावर भर दिला पाहिजे असे संबंधित अधिकाऱ्यांनी सुचवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top