ठाणे :- काश्मीरमधील पहलगामच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची नशा उतरून भारतीय सैन्याने पराक्रम करून दाखवला आहे. या युद्धात भारतीय सैन्याचा सिंहाचा वाटा असल्याने सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ठाणे शहरात तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली. यावेळी ‘हिंदुस्थान जिंदाबाद’…’वंदे मातरम’… ‘भारत माता की जय’ या घोषणेने संपूर्ण ठाणे दुमदुमून गेले. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यसह शेकडो देशभक्त शिवसैनिक बाईक रॅलीत सहभागी झाले होते. गेल्या आठवड्यात भारतीय वीर जवानांनी दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला. या पराक्रमाची देशभर कौतुक केले जात असून दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलेल्या जवानांवर सर्वत्र कौतुक केले जात आहे. यापुढे दहशतवाद्यांनी तोंड वर काढले तर त्यांची नांगी ठेचू असा इशारा देणाऱ्या जवानांच्या पाठीमागे शिवसेना परिवार सदैव उभा राहील असा विश्वास यावेळी राजन विचारे यांनी दिला. दरम्यान, हिंदुस्थानी सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा सन्मान यात्रेत शेकडो देशभक्त हातात तिरंगा घेऊन वंदे मातरम, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या.
यात्रेमुळे शहरात देशभक्त वातावरण
या यात्रेची सुरवात धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्त्तीस्थळपासून झाली. त्यानंतर पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जांभळीनाका, भंडार आळी, सिडको बस स्टॉप, अष्टविनायक चौक, दौलतनगर, कोपरी ब्रीज, ज्ञानसाधना कॉलेज, मेंटल हॉस्पिटल, वागळे चेक नाका, रोड नं. १६ चौक, किसन नगर, वागळे सर्कल, लोकमान्य नगर डेपो, वर्तकनगर, वसंत विहार, मानपाडा, आनंद नगर, विजय नगरी, हिरानंदानी इस्टेट, मनोरमा नगर, ढोकाळी, हायलॅण्ड, बाळकुम, गोल्डन डाईज नाका, वृंदावन, श्रीरंग, राबोडी, उथळसर मार्गे टेंभी नाका, चरई, राम मारुती रोड, गोखले रोड, नौपाडा, हरिनिवास, पांचपाखाडी, महानगरपालिका, चंदनवाडीमार्गी शहीद उद्यान जवळ यात्रेची सांगता करण्यात आली. जवळपास तीन तास चालणाऱ्या या तिरंगा सन्मान यात्रेत ठाण्यात देशभक्त वातावरण निर्माण झाले होते.