ठाणे: वटपौर्णिमा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून या उत्सवात वडाच्या झाडाचे खूप महत्व असते. यात सुवासिनी वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या आयु वाढीची मनोकामना करतात. मात्र एकीकडे पर्यावरण दिन साजरा करत झाडे वाचवा असे आवाहन पालिका करत आहे. मात्र दुसरीकडे वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या फांद्या तोडून जागोजागी विक्री होताना दिसत आहे. याबद्दल पर्यावरण प्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी दरवर्षी वटपौर्णिमेचा उपवास धरतात. या वेळी सुवासिनी वडाची पूजा करून पतीच्या आयु वाढीची इच्छा व्यक्त करत हा सण साजरा करतात. या ‘वटपौर्णिमा’ सणामध्ये वडाच्या झाडाचे खूप महत्त्व असून अनेक महिला वडाच्या झाडाच्या फांद्या घेऊन घरीच पूजा करतात. सध्या यामुळे वडाच्या झाडाच्या फांद्या ठाण्यातील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून महिलांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. मात्र सध्या 5 जून रोजी ठाणे, मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात झाडांच्या संगोपनाची अतिशय आवश्यकता असल्याने पर्यावरण संरक्षणासाठी पालिकेने झाडे तोडू नाका व झाडे लावा असे आवाहन केले. तर दुसरीकडे ‘वटपौर्णिमा’ सणाचे औचित्य साधून विक्रेते सार्वजनिक रस्त्यांच्या आजूबाजूची व खासगी आवारातील वडाचे फांद्या तोडून विक्रीसाठी आणण्यात येत आहेत. यामुळे झाडांची संख्या कमी होऊन पर्यावरणालाही हानी पोहचते. विकासाच्या नावाखाली देखील अनेक झाडांवर तोडक कारवाई सुरू आहे.
वटपौर्णिमा सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यायला हवा. मात्र पर्यावरणाला हानी न पोहोचवता साजरा करा. वडाची तोडलेली फांदी घरी आणण्यापेक्षा एखादे रोप महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुसाठी लावावे. सध्या ही फांदी विकत घेण्यासाठी ग्राहक आहेत म्हणून त्याची विक्री होते त्यामुळे विक्रेत्यांबरोबर ग्राहकांवरती देखील कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच एका दिवसात पर्यावरणाचे जनजागृती करण्यापेक्षा 365 दिवस पर्यावरण संवर्धन ही आपली जबाबदारी आहे या उद्देशाने जागर करण्यात यावा असे पर्यावरण अभ्यासक रोहित जोशी म्हणाले.