कागदपत्र पडताळणीसाठी शिक्षणाधिकारी यांचे पालकांना आवाहन
ठाणे :- जिल्ह्यातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. दि. २१, मे २०२५ रोजी प्रतिक्षा यादी टप्पा क्र. ०४ मधील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियाची मुदत दि. २० मे, २०२५ ते २९ मे, २०२५ पर्यंत देण्यात आली आहे. निवड झालेल्या यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना SMS पाटविण्यात येत आहे. प्रतिक्षा यादीतील बालकांचे पालकांना शाळेच्या रिक्त जागेनुसार SMS पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE PORTAL वरील ‘अर्जाची स्थिती’ या टॅबवर आपल्या बालकांचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी, तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे. प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी अलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत नजिकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून दि. २९ मे, २०२५ रोजीपर्यंत कागदपत्रांची तपासणी करून आपल्या बालकांचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिका अंतर्गत एकूण ६२७ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३२० रिक्त जागा उपलब्ध होते व आतापर्यंत ८ हजार ४९६ प्रवेश झाले आहेत. प्रतिक्षा यादी टप्पा क्र. ०४ मधील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.